Friday, June 28, 2013

उपवास

पुढील व्याख्यान हे आकाशवाणी परभणीवर “आरोग्य साधना” या कार्यक्रमात प्रसारीत झालेले आहे.
हे व्याख्यान ऐकण्यासाठी खालील लिंकवर जा.



      भारतासारख्या मोठया देशात किंवा तसे पाहिले तर एकूणच सर्व जगात उपवासाचे महत्व समजून अधून मधून आरोग्य उपवास किंवा धार्मिक उपवास केले जातात. आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी, महाशिवरात्र, संकष्टी, पर्युषण, रोजे अशा अनेक कारणांनी अनेक लोक वेगवेगळे उपवास करीत असतात.
      काही लोक फक्त श्रावण महिन्यात मांसाहार न करणे यालाच उपवास म्हणतात. उपवास अनेक आणि त्याच्या त-हाही अनेक. परंतु उपवास हा प्रत्येकाने धरावाच व नेटाने सिध्दीस न्यावा. शरीर, मन आणि आत्मा यांच्या शुध्दीसाठी व सिध्दीसाठी उपवास ही एक महत्वाची आवश्यकता आहे. आयुर्वेद शास्त्रात उपवासालाच लंघन असे म्हटले आहे.   
      लघुभोजनं उपवासो वा लंघनम्।
म्हणजेच संपूर्ण भोजनत्याग किंवा हलके भोजन करणे याला उपवास किंवा लंघन म्हटले जाते. काहीही न खाता करायचा उपवास डॉक्टरांच्या देखरेखीखाली व त्यांच्या सल्ल्यानेच करायचा असतो. या दिवसात बाहेर जाणे वर्ज्य समजावे. या उपचारापूर्वी रक्तदाब, वजन, नाडी आणि श्वसनसंस्था इ. ची तपासणी करणे आवश्यक असते. 
      दुसरा प्रकार म्हणजे थोडेसे खाऊन उपवास करणे. एकादशी अन् दुप्पट खाशी’ असा प्रकार थोडेसे खाऊन करायच्या लंघनामध्ये चालत नाही. एरवी उपवासाच्या दिवशी खाल्ले जाणारे साबुदाना, शेंगदाणे, तळलेले पदार्थ इ. प्रकार या उपासात वर्ज्यच असतात. हे पदार्थ खाण्याचे नियम आपणच बनवले आहेत. हे पदार्थ खाल्ल्यामुळे पोट भरल्याची संवेदना होते. परंतू यामुळे लंघन व्हायचे सोडून हमखास पोट बिघडते.
      याऐवजी पचायला हलके पदार्थ घ्यायला हवेत. उपवासामध्ये उकळून अर्धे आटवलेले  कोमट पाणीच दिवसभर घ्यायचे असते व ते सुध्दा गरज लागेल तेव्हाच. साळीच्या कोरडया लाहया तुपावर परतून हळद-मीठ घालून किंवा तांदळाची पेज, मुगाचे सूप, मुग-तांदळाची खिचडी, असा या उपवासासाठीचा आहार घ्यावा. या प्रकारचा उपवास करतेवेळी सुध्दा विश्रांती घ्यावी.
      काही वेळा रोगानुसार धने, बडीशेप, सुंठ घालून केलेले पाणी दिवसभर घ्यायला आम्ही सांगतो. असे उपवास केल्यामुळे आपली ज्ञानेंद्रिये प्रसन्न होतात, अंगाला हलकेपणा येतो, तोंडाला चव येते, मल व मूत्राचे विसर्जन योग्य वेळी होते, शुध्द ढेकर येतात, आळस निघून जातो आणि असलेल्या रोगाचा जोर कमी होतो.

      आयुर्वेदाप्रमाणेच अथर्ववेदातही उपवास हा चिकित्सेचा एक प्रकार सांगितला आहे. म्हटले आहे-     
                        यत् किंचित लाघवकरं देहे तत् लंघनम्।
म्हणजे, ज्या कशाने शरीरात हलकेपणा निर्माण होतो त्याला लंघन असे म्हणतात. आयुर्वेदात ताप, उलटी, जुलाब अशा अनेक रोगांमध्ये लंघन हा पहिला आणि महत्वाचा उपचार सांगितला आहे. आयुर्वेदात उपवासाची अजून एक व्याख्या आढळते.
                        उपावृत्तस्य पापेभ्य: सहवासो गुणै: सह।
                        उपवासो स विज्ञेयो न शारीरविशोषणम्॥  
                                                      चरक-चक्रपाणी टीका.  

पापकर्मातून निवृत्त होऊन परमेश्वरापाशी चित्त एकाग्र करणे याला उपवास म्हणतात. उपवास म्हणजे शरीर शोषण करणे नव्हे.
      कडक उपवास एखाद्या प्रकृतीला चालू शकतो. हलका व कमी आहार घेणे हे मात्र सर्वांनाच आरोग्यदायी ठरते. म्हणजे उपवास हा प्रकृतीनुसार करावा. आयुर्वेद शास्त्रात उपवास करण्यास योग्य कोण आणि अयोग्य कोण यांची यादीच दिली आहे. उदा. ज्यांना मधुमेह, त्वचारोग, स्थौल्य, डोळ्यांचे आजार, शिरोरोग आहेत त्यांनी लंघन करावे. मिठाई किंवा तेलकट पदार्थांचे अतिरिक्त सेवन करणा-यांनी ताप आला असता लंघन करावे. शरीरात आमदोष अथवा अपचनामुळे विषद्रव्यांचा संचय होत असल्यास लंघन करावे.

      कफ व पित्तप्रधान अवस्थेमध्ये लंघन करावे. या विपरीत लंघन कोणी करू नये हेही सांगितले आहे. वाताधिक्य असल्यास, वातरोग, क्षयरोग झाला असल्यास, लहान मुले, वृध्द, दुर्बल व्यक्ती यांनीही उपवास करू नये. उपवासास योग्य व्यक्तींनीही आपली शरीर प्रकृती सांभाळून प्रमाणात उपवास करावा. लंघन/उपवास हा आरोग्य प्राप्तीसाठीच करायचा असल्याने त्याचा अतिरेक होऊ नये.  

भितीपासून दूर कसे राहाल?

पुढील व्याख्यान हे आकाशवाणी परभणीवर आरोग्य साधना या कार्यक्रमात प्रसारीत झालेले आहे.
हे व्याख्यान ऐकण्यासाठी खालील लिंकवर जा.



      भगवत् गीतेमध्ये दुस-या अध्यायात सांगितले आहे- प्रसन्न चेतसो हयाशु: बुध्दि: पर्यवतिष्ठते”. याचा अर्थ ज्याचे मन प्रसन्न आहे, त्याचीच बुध्दी कार्यरत असते.
एखादी व्यक्ती बुध्दिमान असून देखील मन शांत किंवा प्रसन्न नसेल तर ती बुध्दी उपयोगी पडत नाही. मनात भिती आली की वाचलेल्या गोष्टी आठवत नाहीत असा अनुभव परीक्षेला बसणा-या विद्यार्थ्यांना हमखास येतो. परीक्षा केंद्रातून बाहेर पडल्यावर मात्र सर्व मुद्दे पटापट आठवायला लागतात. तोंडी परीक्षेत इतरांना विचारलेले प्रश्न सोपे वाटतात. परंतू स्वत:वर वेळ आल्यावर तेच प्रश्न कठीण वाटतात कारण त्यावेळी आपण तणावात असतो. या ठिकाणी विद्यार्थ्यांना परीक्षेची भिती असते. अगदी लहान मुलांनाही अनोळखी व्यक्तींची भिती वाटते. त्यामुळे नवीन माणसांकडे बघितले की ती रडायला सुरु करतात. लहान मुलांपासून वृध्दांपर्यंत प्रत्येकाला कशाची तरी भिती वाटत असते.
दुस-या बाजूने पाहिले तर दैनंदिन जीवनात भय काही प्रमाणात आवश्यक आहे. भयापासून पूर्ण मुक्ती धोक्याची ठरेल. मृत्यूच्या भयापोटी माणसे प्रकृती सांभाळण्यास उद्युक्त होतात. परीक्षेत अपयशाच्या भितीने विद्यार्थी अभ्यासाला लागतात. सामाजिक नजरेतून उतरू नये म्हणून मनुष्य स्वत:ला नितीपथावर ठेवतो. पोलिसांच्या भीतीने आपण कायदे पाळतो.
परंतू अतिरेकी भिती ही आपली सर्व शक्ती खच्ची करते. स्त्रिया व मुलींना झुरळ किंवा पाल अशा निरूपद्रवी प्राण्यांची भिती वाटते. काहींना आजाराची भिती वाटते. आजाराची कल्पना देखील ते सहन करु शकत नाहीत. शाळेत शिक्षक ओरडतील तर घरी बाबा रागवतील याची भिती विद्यार्थ्यांना असते.
भितीमुळे आपली कार्यक्षमता कमी होते, एक प्रकारची मरगळ येऊ लागते. मन खिन्न होते. आयुष्यात रस वाटेनासा होतो. प्रेमभावना नाहीशी होते. एकाकी पणा जाणवू लागतो. झोप कमी होते. मनात निराशेचे साम्राज्य पसरु लागते. हा एक प्रकारचा विकारच असतो. इतर सर्व आजारांप्रमाणे भयगंड आणि मरगळ येण्यावर उपचार करावे लागतात.
प्रथम आपले शारीरिक आरोग्य सुधारले पाहिजे. त्याकरता सकस आणि संतुलित आहार घेतला पाहिजे. नियमित विविध प्रकारचे व्यायाम योग्य प्रमाणात केले पाहिजेत. सुर्यनमस्कार, कपालभाती, भस्त्रिका पाणायाम इ. योगप्रकार तसेच वीरासन, त्रिकोणासन, ताडासन, इ. उत्साह वाढविणारी आसने योग तज्ञांच्या सल्ल्याने जरुर करावीत. ध्यान, योगनिद्रा यासारखे प्रकारही मनातील भिती घालविण्यास खुप उपयोगी पडतात.
आपल्या मनाचे व्यवहार पाहण्याची सवय लावून घेतली पाहिजे. आपले विचार, आपल्या भावना, आपले अनुभव शब्दात सांगता आले पाहिजेत. आई, वडील, गुरुजन, भावंडे, मित्रमैत्रिणी यांच्या बरोबर मनमोकळेपणे बोलल्याखेरीज आपल्या मनात येणारे विचार योग्य की अयोग्य हे ठरविता येणार नाही.

अशा रुग्णांना क्वचित व्यावसायिक समुपदेशनाची गरज पडू शकते. तसे झाल्यास जरूर मानसोपचार तज्ञाची मदत घ्यावी. परंतू मनात भिती किंवा मरगळ यांना थारा देऊ नये.   

Thursday, June 6, 2013

कोलेस्टेरॉल अर्थात रक्तातील चरबी

पुढील व्याख्यान हे आकाशवाणी परभणीवर आरोग्य साधना या कार्यक्रमात प्रसारीत झालेले आहे.
हे व्याख्यान ऐकण्यासाठी खालील लिंकवर जा.

कोलेस्टेरॉल अर्थात रक्तातील चरबी
      कोलेस्टेरॉल बध्दल आपल्याला थोडीफार माहिती असते. कोलेस्टेरॉल आणि हृदयविकाराचा काहीतरी संबंध आहे हे आपण ऐकलेले आणि वाचलेले असते. कोलेस्टेरॉल हा काहीतरी अपायकारक पदार्थ असावा असे कुठेतरी मनात राहून गेलेले असते.  
      कशाचाही अतिरेक वाईट असतो त्याचप्रमाणे रक्तातील कोलेस्टेरॉल वाढणे वाईटच असते. परंतू काही प्रमाणात कोलेस्टेरॉल केवळ उपयोगीच नव्हे तर आवश्यकही असतो, याची जाणीव ठेवणे आवश्यक असते.
      आपल्या यकृताच्या पेशी रक्तातील कोलेस्टेरॉलचे रुपांतर कोलिक अ‍ॅसिड या रेणूत करतात. या कोलिक अ‍ॅसिडचे रुपांतर पित्तरसातील बाईलसॉल्टसमध्ये होते. बाईलसॉल्टस पचनक्रियेत आणि मेदघटकांच्या शोषणात फार महत्वाचे कार्य करतात.
      कोलेस्टेरॉलचे इतर कार्यही महत्वाचे असते. कॉर्टिसॉल आणि इतर अ‍ॅड्रीनोकॉर्टिकल हॉर्मोन्सची निर्मिती, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन या स्त्रीबीजांडकोशातून स्त्रवणा-या हार्मोन्सची बांधणी, पुरुषत्वाला जबाबदार असणा-या टेस्टोस्टेरॉन या हार्मोनची निर्मिती कोलेस्टेरॉलच्या रेणूपासूनच होते.
      आपल्या त्वचेच्या कॉर्नियम नावाच्या स्तरात कोलेस्टेरॉल साठवून ठेवले जाते. त्वचेत बाहेरुन येणा-या पदार्थांना रोखण्याचे आणि शरीरातील पाणी उडून जाऊ नये यासाठी या स्तराचे महत्व असते.
      कोलेस्टेरॉल रक्तात येते त्याचा फारच थोडा भाग आहारातील कोलेस्टेरॉल मधून येतो. अशा कोलेस्टेरॉलचे प्रमाण जसजसे वाढते, तसतसे रक्तातील लो-डेंसिटी लायपोप्रोटिन्सचे (LDL) प्रमाण वाढू शकते. आहारातील कोलेस्टेरॉल मटण, अंडी, दूध इ. प्राणिजन्य पदार्थातून येणे शक्य असते.
      रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढण्याचे प्रमुख कारण आहारातील सॅच्युरेटेड फॅटस् हे होय. आहारातील मटण, तूप, लोणी, वनस्पती तूप, केक्स्, बिस्कीटे, चीज, आईस्क्रीम, खोबरेल तेल, पाम ऑईल अशा सॅच्युरेटेड फॅटस् मधून मिळते.
      सॅच्युरेटेड फॅटस बरोबरच ट्रान्स फॅटी अ‍ॅसिडस् म्हणजे फास्ट फूडस् नावाखाली येणारे पिझा, पोटॅटो चिप्स्, वेफर्स, केक, बिस्कीटे आणि पुनः पुन्हा उकळ्लेले तेल यामधून मिळतात. या सॅच्युरेटेड फॅटस् आणि ट्रान्स फॅटी अ‍ॅसिडस् मुळे एच.डी.एल.’(H.D.L.) कमी होतो. हृदयविकार होण्याचे हे सर्वात प्रमुख कारण गणले जाते.
      म्हणजेच आहारातील कोलेस्टेरॉलपेक्षा सॅच्युरेटेड फॅटस् आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ट्रान्स फॅटी अ‍ॅसिडस् यांचे सेवन कमी करणे महत्वाचे आहे. विशेषतः सर्व रंगीत भाज्यात व रंगीत फळात असणारे बीटाकॅरोटिन देखील उपयुक्त असते. त्याकरिता लाल भोपळा, माठ, गाजर, कोथिंबिर, मिरची यांचा आहारात समावेश करावा.
      आहारात जोडीला आंबा, चिकू, संत्री, पपई, टरबूज अशी फळे अवश्य खावीत. सामिष आहार घेणा-यांनी मासळी खावी. आहाराइतकेच कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी पायी फिरणे, जॉगिंग, सुर्यनमस्कार इ. व्यायाम प्रकार करणे आवश्यक असते. तसेच धुम्रपान आणि मद्यपान कटाक्षाने वर्ज्य करणे आवश्यक असते. मद्यपानामुळे ट्रायग्लिसराईडस् चे प्रमाण वाढते.
      आपल्या रक्तातील कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईडस्, एल.डी.एल आणि व्ही.एल.डी.एल अशा चरबीच्या घटकांचे प्रमाण वाढल्यावर रक्तवाहिन्यांमध्ये अ‍ॅथेरोस्क्लेरोसिस होऊन रक्तवाहिन्यांना आतून प्लाकस् किंवा चरबीचे थर चढू लागतात आणि रक्तप्रवाहात अडथळा येऊ लागतो. त्यामुळे इस्केमिक हार्ट डिसीज उदा. करोनरी ब्लॉक्स, अंजायना, मायोकार्डियल इन्फाकर्शन असे गंभीर हृदयरोग होतात.
      अशा वेळेस इतर औषधोपचारांबरोबरच कोलेस्टेरॉल कमी करण्याकरता आधुनिक वैद्यकशास्त्रातील काही औषधे वापरली जातात. परंतू काही रुग्णांची भूक मंदावणे, अपचन, गॅसेस, स्नायूंना अपाय झाल्यामुळे अंग दुखणे आणि यकृताचे कार्य बिघडणे असे विविध दुष्परिणाम त्यामुळे घडू शकतात. याशिवाय ही सर्व औषधे सतत वापरण्याकरिता बरीच महाग असतात.

      आयुर्वेद शास्त्रानुसार शरीरातील सात धातूंपैकी चौथा धातू म्हणजे मेद. मेदाचा संबंध शरीरातील चरबी अथवा फॅटस् यांच्याशी लावता येईल. प्रमाणाबाहेर वाढ झालेल्या मेदाला कमी करण्यासाठी काही वनस्पती वापरल्या जातात. त्या मेदाचे लेखन करतात. आयुर्वेद तज्ञांचा सल्ला घेऊन या औषधींचा वापर जरुर करावा.

Wednesday, June 5, 2013

डॉक्टर आणि रुग्ण सुसंवाद

पुढील व्याख्यान हे आकाशवाणी परभणीवर आरोग्य साधना या कार्यक्रमात प्रसारीत झालेले आहे.
हे व्याख्यान ऐकण्यासाठी खालील लिंकवर जा.
https://docs.google.com/file/d/0B7ERAbFjbxCza1dzTHc1T3NuSnM/edit?usp=sharing

डॉक्टर आणि रुग्ण सुसंवाद

जो समाज कलाकारांच्या कलेचे महत्व जाणतो, श्रेष्ठ साहित्यिकांचे अक्षर वाड़मय, संत महंतांचे बोल, राष्ट्रासाठी प्राण अर्पण करणारे देशभक्त यांचे महत्व जाणतो त्या समाजाची सामाजिक प्रकृती चांगली आहे, असे म्हणता येईल.
हा नियम प्रत्येक व्यवसायाला लागू होतो. वैद्यकीय व्यवसायही याला अपवाद नसतो. एका बाजुने वैद्यकीय व्यवसायिक आणि दुस-या बाजूने रुग्ण यांत काही देवाणघेवाण चालू असते. या देवाणघेवाणीत दोन्ही बाजूंनी समाधानी असणे हे समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीतून आवश्यक असते.
वैद्यकीय व्यवसायिक हे या सामाजिक रचनेची एक बाजु असतात. डॉक्टर्स, वैद्य, होमिओपॅथस्, फिजिओथेरपीस्ट, अ‍ॅक्युप्रेशरिस्ट, योग शिक्षक, निसर्गोपचार तज्ञ असे अनेक शास्त्रांचे अभ्यासक या बाजुचा गाभा बनतात.
औषध विक्रेते, परिचारिका, स्वागतकक्षातील सहाय्यिका, रुग्णालय कर्मचारी, औषधे तयार करणा-या कंपन्या इ. देखील याच बाजुला आपापले स्थान सांभाळत असतात. प्रत्येकाने आपापले काम प्रामाणिकपणे करावे अशी समाजाची रास्त अपेक्षा असते. आपण देत असलेल्या सेवेचा योग्य मोबदला मिळावा अशी या घटकांतील व्यक्तींची अपेक्षा असते. हा मोबदला डॉक्टरांची फी, सेवकांचे पगार, औषधांच्या आणि वस्तूंच्या किंमती अशाप्रकारे प्राय: आर्थिक स्वरुपाचा असतो. त्याचबरोबर रुग्णाने आपला सल्ला मानावा अशीही अपेक्षा असते.
कळत नकळत आपल्या सेवेच्या मोबदल्यात रुग्णाने आपल्याला मान द्यावा, समाजाने आपले कौतूक करावे ही देखील महत्वाची अपेक्षा असते. रुग्ण, त्याचे नातेवाईक, मित्रमंडळी, समाजाचे भले चिंतणारे समाजसेवक, हे या देवाणघेवाणीची दुसरी बाजू असतात.
आपली तक्रार दुर व्हावी, आजार जावा, आपल्या माणसाला बरे वाटावे, ही मूळ अपेक्षा असते. डॉक्टरांना उत्कृष्ट ज्ञान असावे. डॉक्टरांकडे सहानुभूती असावी, कणव असावी, आपल्या शारीरिक त्रासाबरोबरच मानसिक, आर्थिक, कौंटुबिक, सांस्कृतिक गरजांचीही दखल घेतली जावी अशीही अपेक्षा असते. या दोन्ही बाजूंच्या अपेक्षा रास्तच आहेत. यशस्वी व्यवसाय म्हणजे दोन्ही बाजूंच्या गरजा पूर्ण होणे. या दोन्ही बाजूंच्या अपेक्षा वास्तव असाव्यात समाजातील बहुसंख्य विचारवंतांना मान्य असाव्यात तरच रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये सुसंवाद घडेल.
वैद्यकीय सुसंवादामध्ये रुग्णाच्या बाजुने महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला होणारे त्रास जावेत ही रुग्णाची अपेक्षा पूर्ण होणे.  डॉक्टरांनी आपले म्हणणे नीट ऐकून घ्यावे, समजून घ्यावे, स्वाभाविकपणे तेवढा वेळ डॉक्टरांनी आपल्याला द्यावा अशी अपेक्षा असते. मला लगेच पाहावे. माझ्यासाठी भरपूर वेळ द्यावा. माझ्या सोयीच्या वेळा आणि सोयीच्या जागी डॉक्टरांनी त्यांचा वेळ काढावा असे वाटणे स्वाभाविक आहे.
व्यवसाय म्हटला की अनेक रुग्णांची गरज पाहावी लागणार, सगळ्यांचे त्याच वेळी, त्यांच्या घरी लगेच पाहण्याची अपेक्षा वाजवी कशी असू शकेल? त्यापेक्षा ज्यांना शक्य असेल त्यांनी आपापल्या डॉक्टरांच्या सोयीच्या जागी वेळ ठरवून त्यांचा सल्ला घेतला, तर ही देवाणघेवाण सुकर होईल.
अर्थातच तीव्र दुखणी आणि अत्यवस्थ अवस्थेत हे नियम मोडावे लागतात अशा रुग्णांना केव्हाही पाहावे लागते. त्यामुळे वेळ जरी ठरविली, तरी ती काटेकोरपणे पाळणे डॉक्टरांना शक्य नसते, याचेही भान रुग्णांना ठेवणे आवश्यक असते.
आपल्याला होणारे त्रास जावेत या हेतूने रुग्ण डॉक्टरांकडे येतात, हे जरी खरे असले तरी आपल्याला नेमका त्रास जाणवतो आहे हे अनेकदा स्पष्ट समजेल अशा शब्दात ते सांगत नाहीत. रुग्णाला नेमका त्रास काय होत आहे हे डॉक्टरला सोप्या शब्दात, निर्भेळपणे सांगणे हा महत्वाचा भाग आहे. यामुळे डॉक्टरांना नक्की निदान करता येते.
जेव्हा एखादा रुग्ण मला चक्कर येते म्हणतो, तेव्हा या तक्रारीचा नेमका अर्थ काय, समजत नाही, चक्कर येणे म्हणजे चालताना तोल जातो का? बसल्या बसल्या आपल्या भोवतालच्या वस्तु फिरत आहेत, अशी भावना होते का? स्वतः फिरत आहोत, असे जाणवते का? झोपताना किंवा झोपून उठताना गर्रकन फिरते का? डोळ्यांसमोर अंधारी येते का? क्षणमात्र बेशुध्द होता का? असे अनेक प्रश्न विचारुन चक्कर येणे म्हणजे नेमके काय होते हे विचारावे लागते.
बाहेरच्या वस्तु किंवा आपण स्वतः फिरणे, अशी भावना पाच-सात सेकंदांसाठी राहणे हे लक्षण कानांच्या आतल्या भागातील लॅबरींथ या भागात किंवा या भागाचे आणि मेंदूचे संबंध यात काही बिघाड झाल्याचे लक्षण असते.
क्षणमात्र डोळ्यासमोर अंधारी येणा-या व्यक्तीच्या मेंदूच्या रक्तपुरवठयात व्यत्यय तर येत नाही ना अशी शक्यता असते. भान हरपणे, बेशुध्द होणे ही लक्षणे निश्चित मेंदूचे विकार दर्शवितात.

आपल्याला काय विकार झाला आहे याचा अंदाज तक्रार म्हणून रुग्ण सांगतात. उदा. पोट दुखणे ही खरी तक्रार आहे. पण मला पित्त झाले आहे, मला अ‍ॅसिडीटी झाली आहे, मला गॅसेस झाले आहेत किंवा कॉस्टिपेशन झाले आहे या सा-या प्रत्यक्ष होणा-या भावना नसून आपल्याला त्रास कशाने झाला आहे, याचा एक अंदाज रुग्णाने व्यक्त केलेला असतो. त्याकरिता रुग्णाने डॉक्टरांना काय त्रास होत आहे हे स्पष्टपणे सांगायला हवे. आपला अंदाज व्यक्त करु नये.